Home » महाराष्ट्र टाईम्स अग्रलेख »
चला, शहाणे होऊ या...
उन्हाचा कडाका भाजून काढतो आहे. अलीकडे मुंबई-पुण्याचे तापमान सतत वाढतेच आहे. विदर्भ-मराठवाड्यात तर उन्हाच्या झळाही डोळ्यांना दिसत आहेत. मे महिन्याची अखेर म्हणजे ऋतुचक्रातले उन्हाळी पर्व संपण्याचे दिवस. परतीचा प्रवास सुरू होतो, तसा उन्हाळा अधिक दाहक होतो. परंतु ही दाहकता झेलत पुढच्या तयारीला लागणे भाग असते. उन्हाचा तडाखा आणि दुष्काळाचा मार झेलत पावसाच्या स्वागताची तयारी करणे भाग असते. मृग नक्षत्रास अवघे ११ दिवस उरलेले आहेत. या वषीर् मान्सून वेळेत आणि त्याच्या संपूर्ण रूपात दाखल होणार असल्याचे अंदाज वर्तवले गेले आहेत. बंगालच्या खाडीत आणि अंदमान निकोबारात मान्सूनला डोहाळे लागल्याची सूचिन्हे हवामान तज्ज्ञांना दिसली आहेत. याचा अर्थ असा की पाऊस त्याचे नेहमीचे वेळापत्रक पाळणार असून तो जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर साधारणत: १० दिवसांत तो मुंबई गाठतो आणि आठवडाभरात महाराष्ट्राच्या डोंगर- दऱ्यांत पसरतो. अर्थात माणसाचा आणि निसर्गाचा काहीही भरवसा देता येत नाही. त्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्याचा लहरीपणाही तो करू शकतो. परंतु तो आपला शब्द पाळेल या भरवशावर दोन महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे मुंबईतील रेल्वे फलाटांवर प्लास्टिकच्या पाकिटांमधून विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाद्य-पदार्थांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. गेल्या काही वर्षांत लेज, कुरकुरे आणि तत्सम पदार्थांनी हल्लाबोल केला आहे. या खाद्यपदार्थांच्या माळांनी दुकाने गजबजलेली असतात. त्यांच्या जोडीला गुटख्याची पाकिटे, शाम्पूची पाकिटे, एवढेच काय आता खोबरेल तेलाचेही प्लास्टिकचे छोटे सॅशे मिळू लागले आहेत. बिस्किटांचेही नाना प्रकार आहेत. शिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर आहेच. आपले सर्व जगणेच प्लास्टिकमय झाले आहे. खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे व्यवस्थित कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची आपल्यापैकी बहुतेकांना लाज वाटत असते. त्यामुळे संपला पदार्थ की दिले पाकिट फेकून असे करीत आपण पावसाळ्यात पाणी तुंबून लोकल ठप्प होण्याची आपल्या परीने व्यवस्था करत असतो. कोणी आपल्याला या पाकिटांच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली, तर आपला स्वाभिमान दुखावतो. विघटन न होणारे आणि कचरा म्हणून अत्यंत तापदायक असलेले हे प्लस्टिक रेल्वे प्लॅटफार्मवरून हद्दपार करण्यासाठी येत्या आठवड्यात रेल्वेतफेर् मोहीम चालविली जाणार आहे. सर्वच दृष्टीने अतिशय योग्य आणि आवश्यक असलेली ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न राहता त्याची अंमलबजावणी देशभरातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर केली जाणे गरजेचे आहे. रेल्वेने ठरवले तर अशा गोष्टी अशक्य नाहीत, हे सिद्ध झालेे आहे. सिगरेट, तंबाखू, गुटखा यांची रेल्वे फलाटावर विक्री न करण्याचा अत्यंत योग्य निर्णय रेल्वेने १०० टक्के यशस्वी करून दाखवला आहे. प्लास्टिकबंदी प्रकरणी विविध कारणे सांगून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता रेल्वेने हा निर्णय राबवावा यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून रेल्वेच्या या मोहिमेला सक्रिय पाठिंबा देत आहे. यात अंतिमत: लोकांचेच हित असून लोकांनीही या प्रकरणी रेल्वेला सहकार्य केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सूनमधील संभाव्य आपत्तीस तोंड देण्यासाठी सरकारने केलेल्या तयारीची माहिती देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वापरलेली भाषा नेहमीची नाही. यावेळी त्यांनी ती माहिती देतानाच या माहितीला छेद देणारी एखादी घटना घडली, हलगजीर्पणा आढळला, तर त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी भाषा वापरली आहे. नालेसफाई, आपत्ती निवारण, आपत्तीच्या वेळी उशिरा पोचणारी सरकारी यंत्रणा याबाबत नेहमीच एकमेकांकडे बोट दाखवले जाते. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे २४ तास कार्यरत असलेले नियंत्रण कक्ष, अत्याधुनिक यंत्रणा आणि वायुदलाच्या हेलिकॉप्टरची उपलब्धता याचा प्रत्यक्ष प्रत्यय महाराष्ट्राला येईल, अशी अपेक्षा करू या. निसर्ग त्याचे काम करतोच. त्याचा लहरीपणा समजून घेत, त्याच्या रौद्र अवताराचा परिणाम कमी करायचा असेल, तर त्याच्या पृथ्वीवरील प्रवाहीपणाला अडथळे आणणा-या प्लास्टिकला आळा घातलाच पाहिजे. आपण शहाणे होणे आवश्यक आहे; आपल्याच भल्यासाठी!

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply