Featured Posts
Recent Articles

मालवणात सागरी प्रवाळांची चोरी?

प्रशांत हिंदळेकर - सकाळ वृत्तसेवा
मालवण - देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारी समुद्री प्रवाळे (कोरल) चोरून त्याची पैशाच्या हव्यासापोटी विक्री केली जात असल्याचा येथील धक्‍कादायक प्रकार घडत आहेत. येथील पर्यटन समुद्र तळाशी असलेल्या अनोख्या जीवसृष्टीमुळे बहरत असताना आता त्याच प्रवाळांची चोरी होऊ लागली आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने भविष्यात सागरी जैवविविधतेबरोबरच येथील पर्यटन अडचणीत येणार आहे.

दरम्यान, वन विभाग निद्रीतावस्थेत असल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींमधून केला जात आहे. पश्‍चिम किनारपट्टीवरील गुजरात वगळता सर्वात आकर्षित समृद्ध प्रदेश म्हणून मालवणचा सागरी किनारा ओळखला जातो. या भागाला सागरी अभयारण्य म्हणून मान्यता मिळाल्याची अधिसूचनाही जारी झाली आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात येथील सिंधुदुर्ग किल्ला तसेच रॉकगार्डनच्या आसपासच्या समुद्रात दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीची समुद्री प्रवाळे आढळून येतात. या प्रवाळांमुळेच मालवणची, जिल्ह्याची राज्य व आंतरराष्ट्रीय पातळींवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून या समुद्री प्रवाळांमुळेच पर्यटन क्षेत्रात स्नॉर्कलिंगचे नवे दालन खुले झाले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांद्वारे येथील सागर तळातील सृष्टी न्याहाळणे हे मुख्य आकर्षण असते; मात्र या प्रवाळांचीच चोरी होत असल्याने नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या प्रवाळांची वार्षिक वाढ ही केवळ दोन ते तीन सेंटिमीटर असते. येथील समुद्राच्या परिसरातील अनेक प्रवाळे ही दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीची आहेत. यातील एक प्रवाळ बाहेर काढले गेले तर दीडशे ते दोनशे वर्षांचे काम एका मिनिटात नष्ट होते. या भागातील प्रवाळांची अशीच चोरी होऊ लागली तर येथील सर्व प्रवाळे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्‍त केली आहे.

किल्ल्याजवळील कवडारॉक परिसरात समुद्राची खोली थोडी कमी आहे. काहीजण पैशाच्या हव्यासापोटी समुद्रतळाशी जाऊन प्रवाळ तोडत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. छोट्या आकाराचे प्रवाळ तोडून ते किनाऱ्यावर आणले जातात. गोव्यातून याला मागणी आहे. शोपीस म्हणून विशिष्ट पद्धतीने त्याचे जतन करण्यासाठी ही प्रवाळे वापरली जात आहेत. पूर्वी असा प्रकार घडत नसे. गेल्या काही महिन्यातच हे प्रकार घडत आहेत. सध्या किरकोळ किमतीला ही प्रवाळे विकली जात आहेत. कवडारॉक परिसरात मोठी प्रवाळे मिळत नाहीत. ती जास्त खोल समुद्रात असतात. ती सहजगत्या काढणे शक्‍य नसते. मात्र या चोरीची व्याप्ती वाढल्यास भविष्यात सागरातील त्या खजिन्यापर्यंत चोरणाऱ्यांचे हात पोहोचण्याची शक्‍यता आहे.

यावर नियंत्रण कोणाचे असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात 2001 मध्ये वन्यजीव कायद्यात बदल होऊन शेड्यूल एक मध्ये समुद्री प्रवाळांना प्राधान्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे समुद्री प्रवाळांच्या होणाऱ्या या चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम वन विभागाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रवाळांच्या संरक्षणाविषयीची माहिती वनविभागास माहिती आहे काय? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींमधून विचारला जात आहे. वन विभागाने समुद्रकिनारी भागात आढळणाऱ्या कासवांना संरक्षण देण्यासाठी ज्याप्रमाणे महत्त्वाची भूमिका बजावली आहे तशीच समुद्री प्रवाळांचे संरक्षण करण्यासाठी मोहीम उभारावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud